‘वंचित’च्या जाहीरनाम्यात शिक्षणावर ९ टक्के तरतूद, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण, कापसाला ९ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन

अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. शिक्षणावर ९ टक्के तरतूद, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण आणि कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. सीएए आणि एनआरसी हे मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे भाजपकडून भासवले जात असले तरी ते देशातील २० टक्के हिंदूंच्याच विरोधातील कायदे आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे आता एनआरसी (NRC)  आणि सीएए (CAA) यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. हे दोन्ही कायदे पूर्णतः असंवैधानिक आहेत. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे, असे भाजपकडून भासवले जात आहे. पण त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळात ज्यांना पेंढारी म्हटले जात होते आणि आता ज्याला आपण व्हीजेएनटी (VJNT) म्हणतो. त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे. भारतीय जनता पक्ष इथल्या हिंदू मतदारांना फसवत असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. एनआरसी आणि सीएए मुस्लिमांच्या विरोधात आहे. पण प्रत्यक्षात ते २० टक्के हिंदू समाजाच्या विरोधातही असल्याचे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा

कंत्राटी कामगाराला ५८ वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन करेल, त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल, असेही जाहिरनाम्यात नमूद करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

शिक्षणाची कैदेतून मुक्तता

शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातो आणि तो अर्थव्यवस्थेवर बोजा आहे असे आम्ही मानतो. शिक्षणाचे खासगीकरण करून शिक्षण महर्षींनी ते कैदी केले आहे. या शिक्षण धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षणाबाबत सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षणावरील तरतूद ९ टक्के

केंद्रात शिक्षणावर फक्त ३ टक्के तरतूद आहे. राज्यात ५ टक्के तरतूद आहे. शिक्षण ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. म्हणून ही तरतूद ९ टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

सोयाबीन, कापसाला चांगला भाव

सार्वजनिक क्षेत्र हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे, तिला आम्ही थांबवणार आहोत. नवीन औद्योगिक धोरण राबवणार आहोत. ज्यामुळे शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रतिक्विंटल भाव किमान ९ हजार आणि सोयाबीनला ५ ते ६ हजार रुपये भाव दिला जाईल. शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा, या दृष्टीने आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे.

ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण

ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण असले पाहिजे, ही मागणी देखील आम्ही करत आहोत. आम्ही सरकारमध्ये आल्यावर एससी, एसटी यांना जे आरक्षण मिळत आहे, त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

प्रतिस्पर्धी उमेदवारांची माहिती उघड करणार

आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आम्ही जाहीर करणार आहोत.  त्यावरून आपल्याला कळेल की त्या उमेदवाराचा समाज/ जात आम्ही का अधोरेखित केला आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

अकोल्यात झालेल्या या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवई आदी उपस्थित होते.

1 Comment

  • Amardeep Bhaware

    जाहिरनामा तर अतिउत्तम आहे पण सर्वच जागेवर उमेदवार देऊ नये. ज्या मतदार संघात बौद्धांची संख्या जास्त आहे तिथेच उमेदवार दिला पाहिजे कारण इतर समाजातील लोक खूप कमी मत देतात आणि तोहि उच्च शिक्षित मतदारच मत देतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!