
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ठाणे जिल्ह्यात ११६.४, रायगड जिल्ह्यात १०८.७ मुंबई उपनगर जिल्ह्यात ९०.४ आणि पुणे जिल्ह्यात ७०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील १० दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार जिल्हे), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्हे), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागाचा यामध्ये समावेश आहे.
८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून, ही परिस्थिती किमान पुढील १० दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्यातील विविध भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. तसेच, राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पूर्वार्धाच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीचे नियोजन करावे. राज्यातील ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, तिथे शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात सर्वाधिक २०३.३ मिमी पाऊस
राज्यात मागील २४ तासांमध्ये (७ जुलै २०२६ रोजी सकाळपर्यंत) झालेल्या पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी: ठाणे- ११६.४, रायगड-१०८.७, रत्नागिरी-५८.४, सिंधुदुर्ग-३७.१, पालघर-२०३.३, नाशिक-३६, धुळे-९.६, नंदुरबार-६.४, जळगाव-८.८, अहिल्यानगर-२६.८, पुणे-७०.९, सोलापूर-३.६, सातारा-४६.६, सांगली-१३.४, कोल्हापूर-४७.७, छत्रपती संभाजीनगर-१४.१, जालना-५.६, बीड-६.२, लातूर-०.७, धाराशिव-६.८, नांदेड-०.५, परभणी-१, हिंगोली- १.९, बुलढाणा- ४.८, अकोला-४.६, वाशिम-१.३, अमरावती-२.३, यवतमाळ-०.८, वर्धा००.८, नागपूर- १.१, भंडारा-१.४, गोंदिया-१.५, चंद्रपूर-०.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात २ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.
