न्यूजटाऊन इम्पॅक्टः एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


मुंबई: राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विविध स्तरावर भूखंड वाटपाला  देण्यात आलेली स्थगिती त्वरित उठवण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून केली आहे. न्यूजटाऊनने याबाबतचे वृत्त दिले होते.

वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर उद्योगांसाठीच्या जमिनीबाबत पुनर्वलोकन केलं जात असल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २० सप्टेंबर रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भूखंड वाटपास दिलेली स्थगिती उठवण्यात आली असल्याचे म्हटले. मात्र आज २२ दिवस उलटूनही भूखंड स्थगिती बाबतचा निर्णय जैसे थे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत दानवे यांनी भूखंड स्थगितीबाबतचे आदेश निर्गमित न झाल्याने भूखंडाच्या निर्णयाबाबतची कार्यवाही ठप्प झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

वाचा न्यूजटाऊनचे वृत्तः उद्योगांसाठी भूखंड वाटपावरील स्थगिती उठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच, १६ हजार ५०० कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव रखडले!

स्थगिती उठवण्याबाबतच्या निर्णयाचे आदेश निर्गमित न केल्याने वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पाप्रमाणे इतर प्रकल्पही अन्य राज्यात जाण्याची शक्यता अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

राज्यातील उद्योगाला चालना मिळावी व राज्यात गुंतवणूक येऊन रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावर जातीने लक्ष घालून स्थगित उठवण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी असे दानवे म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!