देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे काम करणार, ‘विकासाचे धोरण’ डोळ्यासमोर ठेवून भाजपमध्येः अशोक चव्हाण


मुंबईः सकारात्मक आणि विकासाचे धोरण डोळ्यासमोर ठेवून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मी नवीन सुरूवात करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील त्याप्रमाणे मी काम करणार आहे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज स्वीकारून अशोक चव्हाणांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रमुख उपस्थिती होती.

नव्या राजकीय आयुष्याला सुरूवात करत आहे. गेल्या ३८ वर्षांचा हा प्रवास बदलून नवा मार्ग स्वीकारला आहे. नरेंद्र मोदींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या आणि राज्याच्या विकासात योगदान देता यावे यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मी जेथे होतो तेथे प्रामाणिकपणे काम केले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर येथेही प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देतो. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळतील, यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचे माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, असे अशोक चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्राची एक वेगळी राजकीय संस्कृती राहिलेली आहे. सभागृहात कटुता आली तरी सभागृहाबाहेर सर्वांनी चांगले संबंध जोपासलेले आहेत. मी नवीन सुरूवात करत आहे. भाजपच्या ध्येयधोरणानुसार यापुढे काम करणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितील त्याप्रमाणे मी करणार आहे. सर्व गोष्टींवर आजच बोलण्यापेक्षा योग्यवेळी बोलणार आहे, असेही चव्हाण म्हणाले.

 कालपर्यंतचे भ्रष्ट आज पूज्यनीय कसे झाले?-पटोले

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चव्हाणांच्या प्रवेशावरून भाजपवर निशाणा साधला आहे. जो नेता तुमच्यासाठी कालपर्यंत भ्रष्टाचारी होता, तो नेता आता भाजपमध्ये कसा काय चालतो? त्यांनी नेमके काय पुण्य केले ते अचानक तुम्हाला पूज्यनीय वाटू लागले आहेत?  निर्लज्जपणाची देखील काहीतरी एक सीमा असते, असे पटोले म्हणाले.

जाचाला कंटाळून चव्हाण भाजपमध्ये

एकतर भाजपची स्मरणशक्ती कमजोर आहे किंवा ते जनतेला मुर्ख तरी समजतात. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत, असा आरोप भाजपने वारंवार केला आहे. त्यानंतर भाजपने अशोक चव्हाणांच्या मागे ईडी, सीबीआय यांचा ससेमीरा लावला. अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपमध्ये दाखल झाले. हा कृतीचा परिणाम आहे, असेही पटोले म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!