लोकसंख्येच्या निकषावर पात्र असणाऱ्या बंजारा लमाण तांड्यांना महसुली ग्रामपंचायतीचा दर्जा देणार


मुंबई: राज्यातील विविध महसूल विभागात लोकसंख्येच्या निकषावर पात्र असलेल्या बंजारा लमाण तांड्यांना महसुली ग्रामपंचायतचा दर्जा देण्याचा प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. याबाबत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक विभागीय आयुक्तांना थेट दूरध्वनीद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.

संत सेवालाल बंजारा/ लमाण तांडा समृद्धी योजनाबाबत मंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली  बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. यावेळी ग्रामविकास विभागाचे सहसचिव वि. श.बोंदरे, बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेच्या राज्यस्तरीय समितीचे अशासकीय सदस्य महंत जितेंद्र महाराज, श्रावण चव्हाण तसेच समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

विविध महसुली विभागामध्ये याबाबत जिल्हा अथवा पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. महसुली गावाचा दर्जा देण्याचे अधिकार विभागीय पातळीवर दिलेले आहेत. शासनाने तांड्याच्या विकासासाठी यापूर्वी दिलेल्या १३९ कोटी रुपये निधीतील झालेल्या कामांच्या खर्चाचा आढावा घेतला जाईल, असे गोरे म्हणाले.

प्रत्येक तांड्यावर स्मशानभूमी व सभागृह उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असून महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी पात्र असलेल्या तांड्यांच्या प्रस्तावांना मान्यता देताना कोणतेही तडजोड केली जाऊ नये, असे गोरे म्हणाले. बैठकीमध्ये समाजाच्या विविध मागण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. यासह राज्य विभागीय व जिल्हास्तरीय समितीतील सदस्यांना ओळखपत्र देणे, शासन निर्णयातील लमाण या नावाऐवजी ‘लभाणा’ अशी सुधारणा करणे यासाठी कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.

राज्यात ३ हजार ९०० तांडे

राज्यात ३ हजार ९०० तांडे असून यातील अनेक तांड्यांना महसुली दर्जा नाही विशेषता ७०० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तांड्यांना महसुली ग्रामपंचायत दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव जिल्हा अथवा पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. जवळपास ४०० तांड्यांची लोकसंख्या ७०० पेक्षा जास्त आहे, अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!