श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागम कार्यक्रमासाठी ९५.३५ कोटींची तरतूद; विविध जिल्ह्यांत विशेष कार्यक्रमांचे आयोजन, वाचा तपशील


मुंबईः ‘हिंद-की-चादर’ म्हणून ओळखले जाणारे शीख धर्माचे नववे गुरू श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी शताब्दी समागम वर्षानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय भव्य महोत्सवासाठी ९५ कोटी ३५ लाख ६४ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंगळवारी राज्यमंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १३ जून २०२५ रोजी ‘हिंद-की-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० वी शहीदी समागम” बाबत बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत राज्यस्तरीय समन्वय समिती, क्षेत्रीय आयोजन समित्या आणि विविध व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यास मंजुरी देण्यात देण्यात आली होती.

श्री गुरु तेग बहादूर यांनी १७ व्या शतकात धर्मरक्षा, मानवी हक्क आणि अन्यायाविरुद्ध निर्भीड आवाज उठवून बलिदान दिले. त्यांचे प्रवचन आणि भजन ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये समाविष्ट असून त्यांनी परोपकार, सेवा, साधेपणा आणि आध्यात्मिकतेचा आदर्श दिला.

त्यांच्या या कार्याला अभिवादन म्हणून राज्यभरात नांदेड, नागपूर आणि खारघर या  तीन प्रमुख केंद्रांतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.

  • १६ नोव्हेंबर २०२५ रोजी नांदेड केंद्रांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून त्यात छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव, सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे.
  • ६ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर केंद्रांतर्गत कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांचा समावेश आहे.
  • २१ डिसेंबर रोजी खारघर (जिल्हा रायगड) केंद्रांतंर्गत आयोजन केले जाणार असून त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमांसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती,  तसेच, नांदेड, नागपूर आणि खारघर येथे क्षेत्रीय आयोजन समित्या स्थापन करण्यात आल्या असून, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक आयोजन व व्यवस्थापन समित्या कार्यरत राहतील. या शताब्दी समागमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर यांच्या धर्मरक्षण, सहिष्णुता, आणि मानवी एकतेच्या संदेशाचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचे उद्दिष्ट आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!