
मुंबईः राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात कार्यरत असलेल्या आणि १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सार्वनजिक आरोग्य विभागातील पदांबरोबरच ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील रिक्त पदांवर नियमित सेवेत समायोजन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. हे समायोजन करताना सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन केले जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १४ मार्च २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय यापूर्वी मंत्रिमंडळाने घेतला होता. त्या निर्णयात दुरुस्ती करून या सेवांचे समावेशन सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार १० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर सेवा समायोजन सार्वनजिक आरोग्य विभागातील पदांबरोबर, ग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेतील रिक्त पदांवर करण्यात येणार आहे.
यात सरळसेवेने भरावयाची सध्या रिक्त असलेली पदे व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १४ मार्च २०२४ पूर्वी १० वर्षे पूर्ण झालेल्या कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांची संख्या यापैकी जी संख्या कमी असेल तेवढी पदे राखून ठेवण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आला.
