
मुंबई: राज्याच्या काही भागात पुढील काही दिवसांत मान्सूनची वाटचाल होण्यास अनुकुल स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने आज आणि उद्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवला असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
जून महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही संपूर्ण राज्यात अजूनही मान्सून सक्रीय झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या तसेच देशाच्या इतर काही भागात २३ जूनच्या आसपास मान्सूनची पुढील वाटचाल होण्यास हवामानाची स्थिती अनुकुल आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात मान्सून पुढे सरकण्याचा अंदाज आहे.
२४ आणि २५ जूनच्या आसपास कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर पुढील काही दिवसात संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) ठाणे, मुंबई, रत्नागिरी जिल्ह्यात दुपार किंवा सायंकाळी हलक्या किंवा ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
धुळे, जळगाव, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यातही आज ढगांचा गडगटासह वादळी पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
