तयारी निवडणुकांचीः राज्यात एकूण ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदार, आयोगाने जाहीर केली आकडेवारी

मुंबई: महाराष्ट्रात येत्या मे महिन्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच केले असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने निवडणुकांची तयारीही करून ठेवली आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तयारी करण्यात आली असून आज निवडणूक आयोगाने राज्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार राज्यात एकूण ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यावेळी उपस्थित होते.

हेही वाचाः ‘मे महिन्यात राज्यात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका, तयारीला लागा!’

ऑगस्ट, २०२२ ते ०७ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत पूर्व-पुनरीक्षण उपक्रम राबवण्यात आले होते. या कालावधीमध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण, दुबार नोंदणीच्या त्रुटी दूर करणे इत्यादी सुधारणा करून ९ नोव्हेंबर २०२२ रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या कालावधीत युवा मतदारांनी तसेच दिव्यांग, महिला, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय व्यक्ती व विमुक्त भटक्या जमातीतील पात्र व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, असे देशपांडे यांनी सांगितले.

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील विशेषतः असंरक्षित आदिवासी गट (पीव्हीटीजी) प्रवर्गातील पात्र व्यक्तींची १०० टक्के नोंदणी करण्याबाबत निर्देश दिले होते. त्याप्रमाणे १०० टक्के नोंदणी केल्याबाबत संबंधित जिल्ह्यांनी प्रमाणित केले आहे.

आकडे बोलतात…

  • पुरूष मतदारः ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९
  • महिला मतदारः ४ कोटी ३१ लाख ४५ हजार ०६७
  • तृतीयपंथी मतदारः ४ हजार ७३५
  • दिव्यांग मतदारः ६ लाख ७७ हजार ४८३
    …………………………………………………………..

एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर, २०२२ या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारुन २६ डिसेंबर, २०२२ पर्यंत सर्व दावे व हरकती निकालात काढण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आज ५ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात पुरूष मतदारांची संख्या ४ कोटी ७१ लाख ३५ हजार ९९९, महिला मतदारांची संख्या ४ कोटी ३१ लाख ४५ हजार ०६७ तर तृतीयपंथीय मतदारांची संख्या ४ हजार ७३५ असून एकूण मतदारांची संख्या ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ असल्याची माहिती देशपांडे यांनी यावेळी दिली.

या यादीत नाव आणि इतर माहितीत दुरूस्ती केलेले पुरूष मतदार १ लाख ५२ हजार २५४, महिला मतदार १ लाख ६ हजार २८७ तर तृतीयपंथीय ९० असे एकूण २ लाख ५८ हजार ६३१ मतदार आहेत. ९ नोव्हेंबर २०२२ च्या नोंदणीनुसार राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ४२ हजार ३०१ इतकी होती. तर, ५ जानेवारी २०२३ नुसार त्यात वाढ होऊन ती ९ कोटी २ लाख ८५ हजार ८०१ एवढी झाली आहे.

एकूण मतदारांपैकी दिव्यांग मतदारांची संख्या ६ लाख ७७ हजार ४८३ इतकी असून, गतवर्षीच्या तुलनेत यात १५ हजार ३३२ ने वाढ झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!