विद्यापीठे-महाविद्यालयांच्या सर्व परीक्षा ३१ मेपर्यंत आणि निकाल ३० जूनपर्यंतच, चंद्रकांत पाटलांनी दिली डेडलाईन

मुंबईः राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा ३१ मेपर्यंत पूर्ण होतील याचे नियोजन करून ३० जूनपर्यंत निकाल जाहीर करावेत. जून-जुलैमध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करा, अशा सूचना करत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील विद्यापीठांना डेडलाईन ठरवून दिली.

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनात संपन्न झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी या सूचना केल्या. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उपसचिव अजित बाविस्कर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, शैक्षणिक शुल्क समितीचे अध्यक्ष विजय अचलिया, माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे व सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे परीक्षा वेळापत्रक, परीक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठांनी नियोजन करा. राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षा ३१ मेपर्यंत पूर्ण होतील याचे नियोजन करून ३० जूनपर्यंत निकाल जाहीर करा. जून-जुलैमध्ये सीईटी परीक्षा, निकाल आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी वेळापत्रकाचे नियोजन करा, असे पाटील म्हणाले.

विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करा.त्यामुळे विद्यार्थ्यांना राज्याबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या संधी अधिक उपलब्ध होण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांचा मानसिक त्रासही कमी होईल, असे पाटील म्हणाले.

नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांतील प्रवेश बंदः विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेच पाहिजे. ज्या महाविद्यालयांना पाच वर्षापेक्षा अधिक काळ झालेला आहे. त्यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रिया केली नाही. अशा महाविद्यालयाचे प्रथम वर्ष प्रवेश बंद करण्यात येईल. तसेच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये अधिकाधिक स्पष्टता आणून येत्या शैक्षणिक वर्षांपासून अंमलबजावणीला गती द्या, असेही पाटील म्हणाले.

उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थी संख्या विशेषत: महिलांची संख्या वाढवण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. यासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल, असेही पाटील यांनी सांगितले.

गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करा-कोश्यारीः विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नावीन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु, गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे  नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी या बैठकीत केले.

त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज आणि सुलभ उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्त्वाची आहे, शैक्षणिक अडचणी आणि त्यावर उपाययोजनासाठी विद्यापीठ आणि राज्य शासन यांनी समन्वयातून कार्य करावे, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

या बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रस्तोगी यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सद्य:स्थिती याबाबत सादरीकरण केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम, पुस्तक, शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये उपलब्ध होण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ‘उडाण’ प्रकल्पाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!