![](https://newstown.in/wp-content/uploads/2024/07/flood-pune3-1024x585.jpg)
मुंबई: मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. मात्र जिल्हा, मनपा प्रशासन सज्ज असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे तिथे बचाव कार्य वेगाने सुरु आहे. काळजीचे कारण नाही, मात्र नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने आवश्यकतेप्रमाणे एकमेकांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
एक टीमवर्क म्हणून काम करून पूर परिस्थितीतल्या लोकांना सुरक्षित हलवणे, त्यांना अन्नाची पाकिटे देणे, औषध, पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वेळप्रसंगी एनडीआरएफ, लष्कर, नौदल यांची मदत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पुणे, मावळ, मुळशी येथे धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस जास्त पडला आहे, त्यामुळे पुण्याला फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बचाव कार्यासाठी प्रसंगी हेलिकॉप्टरचा वापर
मुंबईत कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे. पुण्याला संबंधित लष्कर व नौदल अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. एखाद्या ठिकाणी लोक अडकले असतील तिथे प्रसंगी हेलिकॉप्टरच्या उपलब्धतेबाबत सूचना दिल्या आहेत. मुंबईत कुर्ला, घाटकोपर येथे साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरु आहे. मुंबईत २५५ पंप सुरु असून मुंबई मनपा आयुक्तांना संपूर्ण यंत्रणा या कामी लावण्याचे निर्देश दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
हार्बर रेल्वेची यंत्रणाही सज्ज
मुंबईत पाऊस वाढल्याने मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेच्या यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. माझे आपणास आवाहन आहे, की नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मंत्रालय तसेच जिल्हा पातळीवरून प्रशासन परिस्थितीवर संपूर्ण नजर ठेवून आहे आणि यंत्रणा फिल्डवर उतरून काम करीत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.