इयत्ता बारावीच्या परीक्षेचा उद्या २ मे रोजी निकाल, दुपारी १ वाजता होणार निकालाची लिंक ओपन; वाचा कुठे आणि कसा पहायचा निकाल?


पुणेः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल २ मे रोजी (शनिवारी) जाहीर केला जाणार असून दुपारी १ वाजता निकालाची लिंक ओपन होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती,  नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान इयत्ता १२ वी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (एचएससी)  घेण्यात आली होती. या परीक्षेला १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

कुठे पहायचा निकाल?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल  दुपारी १ वाजेपासून

1. https://results.digilocker.gov.in

2. https://mahahsscboard.in

3. https://hscresult.mkcl.org

या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

निकालाची प्रत कुठे मिळणार?

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

तसेच https://mahahsscboard.in ( in college login ) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 गुणपडताळणी कशी करायची?

ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी ) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी रविवार दिनांक ३ मे ते रविवार दिनांक १७ मे २०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card / UPI / Net Banking याद्वारे भरता येईल.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन कसे करायचे?

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या इयत्ता बारावी म्हणजेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

श्रेणी सुधारण्यासाठी तीन संधी

इयत्ता बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रुवारी-मार्च २०२७ व जून- जुलै २०२७) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरुन घेण्याच्या तारखांचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!