
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): बोगस एम.फिल. पदव्यांच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेत सूट मिळवून दोन संस्थाचालकांनी पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याचे प्रकरण गाजत असतानाच वाङ्मयचौर्य करून सादर केलेल्या शोधप्रबंधांच्या आधारे प्रदान करण्यात आलेल्या पीएच.डी.च्या पदव्या तत्काळ रद्द करा आणि पीएच.डी. च्या आधारे कोणतेही लाभ देण्याआधी वाङ्मयचौर्याचा अद्ययावत अहवाल सादर करणे अनिवार्य करा, अशी मागणी आता पुढे आली आहे.
देशभरात पीएच.डी. च्या प्रबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाङ्मयचौर्य होत असल्याच्या असंख्य तक्रारी येऊ लागल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१८ मध्ये या वाङ्मयचौर्याला पायबंद घालण्यासाठी ‘विदयापीठ अनुदान आयोग (उच्चशिक्षण संस्थांमधील विद्यामूलक सत्यनिष्ठा आणि साहित्यिक चोरीच्या प्रतिबंधाला प्रोत्साहन) नियम’ लागू केला. या नियमात पीएच.डी.चे प्रबंध आणि रिसर्च पेपर्समधील वाङ्मयचौर्याला आळा घालण्यासाठी उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. मात्र यूजीसीने सूचवलेल्या या उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. न्यूजटाऊनने मे २०२४ मध्ये केलेल्या केसस्टडीजमध्ये असे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले होते.
त्यातच आता पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे नाव व लोगो वापरून तयार करण्यात आलेल्या बनावट एम.फिल.च्या आधारे कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आस्मा इद्रिस खान आणि सहसचिव पठाण मकसूद खान या दोघांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट परीक्षेतून सूट मिळवून पीएच.डी.ला प्रवेश मिळवल्याचे प्रकरण गाजत असतानाच वाङ्मयचौर्य करून सादर करण्यात आलेल्या शोधप्रबंधांच्या आधारे प्रदान करण्यात आलेल्या पीएच.डी.च्या पदव्या तत्काळ रद्द करा, अशी मागणी रिपाइंचे (आठवले) शहर जिल्हाध्यक्ष नागराज गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्याकडे केली आहे.
वाङ्मयचौर्याच्या बळावर विद्यावाचस्पती झालेल्यांच्या पीएच.डी.च्या पदव्या रद्द करण्याची मागणी करतानाच गायकवाड यांनी यापुढे विद्यापीठस्तरावर पीएच.डी. पदवीच्या पात्रतेच्या आधारे कोणतीही नोकरी, पदोन्नती किंवा इतर कोणतेही लाभ द्यावयाचे असल्यास वाङ्मचौर्याचा (प्लॅगारिझम) अद्ययावत अहवाल जोडणे अनिवार्य करा, अशी मागणीही गायकवाड यांनी केली आहे. गायकवाड यांनी या निवेदनात प्रमाणापेक्षा जास्त वाङ्मयचौर्य करून पीएच.डी. पदवी मिळवलेल्या काही ‘विद्यावाचस्पतीं’ची उदाहणेही दिली आहेत. त्यापैकी काही उदाहरणे अशीः
नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात सध्या कार्यरत असलेले आतिश राठोड यांनी जालन्याच्या मत्स्योदरी महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक डॉ. शिवाजी मदान यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ए स्टडी ऑफ लेबर वेल्फेअर्स प्रॅक्टिसेस इन स्माल अँड मिडियम इंडस्ट्रीज इन महाराष्ट्र स्टेट’ या विषयावर पीएच.डी.साठी सादर केलेल्या शोधप्रबंधात ९४ टक्के वाङ्मचौर्य आहे. त्यांना ऑक्टोबर २०१४ मध्ये पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे.
गंगापूरच्या मुक्तानंद महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉ. दीपक अशोक निकम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वाणिज्य विभागातील प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक डॉ. गजानन सुरासे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ए स्टडी फरफॉर्मन्स इव्हॅल्यूएशन ऑफ सिलेक्टेड व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर्स इन महाराष्ट्र स्टेट’या विषयावर शोधप्रबंध सादर केला आहे. त्यांना ऑगस्ट २००९ मध्ये पीएच.डी. प्रदान करण्यात आली असून त्यांच्या शोधप्रबंधात प्रमाणापेक्षा जास्त म्हणजेच ३३ टक्के वाङ्मयचौर्य आहे.
गायकवाड यांनी या निवेदनात अन्य काही वाङ्मयचोरांची नावे दिली असून संशोधक छात्र, संशोधन मार्गदर्शक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करून प्रदान करण्यात आलेली पीएच.डी.पदवी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली आहे.

