कोल्हापुरात औरंगजेबावरून रणकंदन, आक्रमक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार


कोल्हापूरः  औरंगजेबाचा संदर्भ देऊन काही तरूणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यामुळे कोल्हापुरात तणाव निर्माण झाला आहे. आक्षेपार्ह स्टेट्स शेअर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी लागू केलेला जमावबंदी आदेश धुडकावून मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी आंदोलक रस्त्यावर आले आहेत. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांत संघर्षाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

कोल्हापुरातील काही तरूणांनी औरंगजेबाचा संदर्भ देऊन सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या तरूणांवर कारवाई करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली. यादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी काही भागात तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेले हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. पोलिसांनी शांततेचे आवाहन करूनही ते ऐकायला तयार नसल्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिल्यामुळे काल रात्रीपासूनच चौकाचौकात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांना बंद मागे घेण्याचेही आवाहन केले होते. तरीही संघटना बंदच्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे पोलिसांनी काल रात्री उशिरा कोल्हापुरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश धुडकावून कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर आलेले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!