
धाराशिव (उस्मानाबाद): लिंग भेद दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या सहाय्याने अंगाई आणि युनिसेफतर्फे लिंग समभाव या विषयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना प्रबोधनपर प्रशिक्षण दिले जात आहे. युनिसेफ आणि अंगाई यांच्या सहकार्याने देशात पहिल्यांदा धाराशीव जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आलेल्या लिंग समभाव शिक्षण उपक्रमामुळे ग्रामीण मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत आहे. खेळाधारित शिक्षण, संवाद आणि सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींमध्ये समानतेची जाणीव निर्माण होत आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण आणि प्रशिक्षणाची जिल्हा संस्था डाएटच्या (डीआयईटी) सहकार्याने राबवण्यात आला. संपूर्ण भारतामध्ये केवळ धाराशिव जिल्ह्यात हा प्रकल्प राबवला असून त्यामध्ये १२० शाळा, ८००हून अधिक शिक्षक आणि १८,००० हून अधिक मुलांचा सहभाग होता. धाराशिवमध्ये प्रायोगिकतत्वावर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील धाराशिवमध्ये, अंगाई-युनिसेफतर्फे लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता.
“मी माझ्या आईशी आणि काकूशी याबद्दल बोलले. त्यांनाही हा भेदभाव जाणवला नव्हता. त्या जुन्या परंपरेनुसार मुलींना कमी अन्नाची गरज असते, असंच मानून चालल्या होत्या. पण मी त्यांना समजावून सांगितले की आम्हा दोघांनाही समान अन्नाची गरज आहे, कारण आम्ही दोघेही समान कामं करतो,” आर्णी गावातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या प्रज्ञा पाटोळे हिने स्वानुभव कथन केला. शासन आणि युनिसेफ, अंगाई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उपक्रमामुळे मुलींना लिंग समभावाचे शिक्षण मिळाले. यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या सहायाने कुटुंबीयांच्या विचारसरणीत सकारात्मक फरक पडत आहे.
या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेक मुली उच्च शिक्षण घेऊ इच्छितात…प्रज्ञा संवाद साधताना म्हणाली, भविष्यात डॉक्टर बणून विशेषतः महिलांच्या आरोग्य, पोषण आणि मासिक पाळी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याची इच्छा आहे. समाजात अजूनही दुर्लक्षित असलेल्या या विषयांवर काम करण्याचा तिचा निर्धार आहे.
आज प्रज्ञा गावातील बालसभा, शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लिंग समभावाबाबत जागृती करते. “बदल सोपा नाही, पण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे,” असे ती ठामपणे सांगते. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ही मुलगी आता समानता आणि न्याय्य समाजाचे स्वप्न पाहत आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी धाडसाने पुढे जात आहे. या उपक्रमामुळे समाजात स्त्री-पुरूष समानतेचे धडे बालपणी मिळत असल्याने लवकरच मोठ्या प्रमाणात बदल घडू शकेल असा विश्वास शासन आणि संस्थांच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे.
