
मुंबई: राज्यातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने नेहमीच प्राधान्य दिले असून छत्रपती संभाजीनगरातील (औरंगाबाद) नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेली नळ पाणीपुरवठा योजना डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
आमदार विलास भुमरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उपस्थित केला होता. या लक्षवेधीस उत्तर देताना उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरासाठी राबवण्यात येत असलेली नळपाणी पुरवठा योजना काही अडथळ्यांमुळे लांबली.
या योजनेच्या कामाचा उच्च न्यायालय दर १५ दिवसांनी आढावा घेत आहे. न्यायालयाने केलेल्या सूचनांनुसार या योजनेची कामे केली जात आहेत. या योजनेबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या, असे सामंत म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहराला दररोज १६६ एमएलडी पाण्याची आवश्यकता असून सध्या ९० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे, अशी माहितीही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
