छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजेंना नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांकडून मज्जाव!

नाशिकः नाशिकच्या काळा मंदिरातील महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्याचा आरोप छत्रपती संभीजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केला आहे. शंभर वर्षातही ही मानसिकता का बदलली नाही? असा सवाल करत संयोगिताराजे यांनी अजूनही छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रूजवावे लागणार आहे, असे म्हटले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे या नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना आलेला अनुभव त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शेअर केला आहे. काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगिताराजे यांनाच वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.

नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला.  अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच, असे संयोगिताराजे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

संयोगिताराजेंनी केलेली पोस्ट अशीः

“हे श्रीरामा, स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धी दे…हीच आमची प्रार्थना, अन हेच आमुचे मागणे,माणसाने माणसाशी माणसासम वागणे..

आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते. त्यांचा वैचारिक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळाराम मंदिरात महामृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.

नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच… तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.

या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे… अजूनही खूप प्रवास बाकी आहे…अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!, असे संयोगिताराजे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!