राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू


मुंबई: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील.

आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला. या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजिटल अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात सरकार प्रयत्नशील असून, त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास फडणवीस नागपूर येथून आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आदी मान्यवरांसमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले. वर्षा शासकीय निवासस्थानी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.

आपल्याला कोरोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे, असे शिंदे म्हणाले.

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देखील आरोग्य विषयाला प्राधान्य दिले होते. आज मुंबईमध्ये सुमारे २५० आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आपण या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी आरोग्य विभाग कौतुकास पात्र आहे,  असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत ६ हजार २०० रुग्णांना एकूण ५२ कोटी रुपयांहून अधिकची मदत करता आली. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे. आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. पंतप्रधान नरेंद मोदी हे देखील सामान्यांच्या आरोग्य सेवा आणि उपचारांबाबत संवेदनशील आहेत. त्यामुळे केंद्र स्तरावरून राबवण्यात येणाऱ्या आणि राज्याच्या योजना यामुळे डबल इंजिन सरकारचा राज्यातील जनतेला डबल फायदा होणार आहे. यापुढे जाऊन आपण जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये या सर्वच ठिकाणी आरोग्य सेवा सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शिंदेंनी सांगितले.

सर्व सामान्यांच्या आयुष्यात चांगले बदल घडविण्याचा प्रयत्न आहे. आरोग्य क्षेत्रातील या चांगल्या सुविधा खेड्या-पाड्यापर्यंत आणि तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे, याचे समाधान आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला, कष्टकरी-कामगार आणि बळीराजाला दिलासा देण्यासाठी जाणीवपूर्क प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पातूनही पंचामृत संकल्पनेतून सर्व सामन्यांच्या हितांच्या गोष्टींना, विकासाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.

ही अतिशय उत्तम संकल्पना आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून ३० सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्ला देखील मोफत मिळणार आहे. सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेणार हा उपक्रम आहे. आपण अर्थसंकल्पातच या संकल्पनेसाठी तरतूद केली होती. यात ५०० दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत. त्यातील आज ३१७ दवाखाने सुरु होत आहेत. हेच आपल्या गतीमान सरकारचे वैशिष्ट्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

 महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली आहे. यात आता ९०० शस्त्रक्रिया मोफत करता येतात. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांचे पर्यंतचे उपचार होतात. अशा रितीने राज्यातील सुमारे ८ कोटी लोकांना आता मोफत उपचार मिळू लागले आहेत. सामान्य माणसांला आरोग्य सेवा, उपचाराचा बोजा उचलावा लागू नये अशी ही तरतूद आहे. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महिला, शेतकरी यांच्या करिताच्या महत्त्वपूर्ण निर्णयांची तसेच गरींबाकरिता घरे विशेषतः ओबीसींसाठी घर निर्मिती, रोजगार निर्मितीवर भर याबाबतही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखाना ही संकल्पना मांडली. तिचा आपण अल्पावधीत विस्तार केला. आज आपण माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात सुमारे ४ लाख ३९ महिलांची तपासणी पूर्ण केली असून, त्यांच्यावर ७० टक्के उपचार देखील पूर्ण केले आहेत. सदृढ बालक योजनेचीही यशस्वी अमंलबजावणी सुरु आहे. मेळघाटातील कुपोषण मुक्ती याबाबत आपण प्रभावीपणे काम करत आहोत, असे सावंत म्हणाले.

 औषध प्राधिकरणाची निर्मिती, जनआरोग्य योजना तसेच आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर देत आहोत. संपूर्ण राज्यातील जनतेच्या आरोग्याची सुखरूपता हा मुख्यमंत्री महोदयांचा प्राधान्यक्रम आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग अथकपणे प्रयत्नशील आहे. त्यातूनच आज आपण वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना यशस्वीपणे राबवत आहोत. या योजनेतील दवाखान्यांची संख्या लवकरच वाढवली जाईल, असे सावंत यांनी सांगितले.

सुरुवातीला आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून आपला दवाखाना योजनेच्या विस्ताराचे अनावरण करण्यात आले. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!