मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होण्यास लागतील नऊ महिने!


मुंबई: मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण न झाल्याने कामाला विलंब होत होता. परंतु हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा हीच सरकारची भूमिका आहे. येत्या ९ महिन्यांत या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्या आदिती तटकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी चव्हाण यांनी ही माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अमित साटम, सुनील प्रभू, वैभव नाईक यांनी सहभाग घेतला.

महामार्गाचे पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर हे सुमारे ८४ किमीचे रखडलेले काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. भूसंपादन, विविध खात्याची परवानगी मिळवणे, परवानग्या घेऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणे यासाठी बराच कालावधी उलटून गेला आहे. या कामासाठी वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील अडचणी प्रत्यक्षात समजावून घेऊन जलद गतीने काम करण्यासाठी प्रयत्न केला गेला आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर रस्त्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण करा

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे. महामार्गाचे काम १० पॅकेजेसमध्ये सध्या सुरु आहे. त्यापैकी ५ पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतिपथावर आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात आज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार जयंत पाटील, आमदार भरत गोगावले, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते, तर आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदी लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते. 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील कासू ते पनवेल या सुमारे ४२ किलोमीटरच्या महामार्गावरील एका मार्गिकेचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच याच महामार्गावरील दुसऱ्यामार्गिकेच्या रस्त्यावरील खड्डे लवकरच भरण्यात येतील. या रस्त्याचे पॅचवर्क तसेच आवश्यक काँक्रिटीकरणाचे काम लवकर करण्याचे निर्देशही चव्हाण यांनी दिले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत कामे लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने युध्दपातळीवर कामे करण्यात येतील. नॅशनल हायवे ऑथोरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांमध्ये योग्य समन्वय राखण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. तसेच जे काम अपूर्ण राहिले आहे, त्या सर्व कामाची प्रगती पाहण्याच्या दृष्टीने या कामाचे चित्रीकरण ड्रोनच्या साहाय्याने करण्याचे निर्देशही चव्हाण यांनी यावेळी दिले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट्स आहेत, ते काम पावासाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. तसेच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे शिल्लक काम हे नियमित कंत्राटदारांकडून करण्यात येईल. अन्य छोटी-छोटी कामे ही अन्य ठेकेदारांकडून पूर्ण करुन घेण्यात येतील. या महामार्गावर प्रवास करणा-यांना त्रास होऊ नये व त्यांचा प्रवास सुखकर होईल यादृष्टीने काम करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी दिल्या.

परशुराम घाटाचे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा घाट किमान सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. त्यामुळे या घाटातील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असलेला चेळणीचा पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल.तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे. ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!