आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच साजरा होणार शिवजयंती उत्सव!


मुंबई: आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’मध्ये यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास केंद्र सरकारने नुकतीच अनुमती दिली आहे. आग्र्याच्या रकबगंजमध्ये आग्रा किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. शिवछत्रपतींनी आग्रा येथील याच किल्ल्यात बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. अशा ‘दिवाण-ए- आम’ मध्ये शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याने आग्रा किल्ल्याच्या आसमंतात शिवछत्रपतींचा जयजयकार घुमणार आहे. त्यादृष्टीने यंदाची शिवजयंती विशेष ठरणार आहे.

आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात ही जयंती साजरी करण्याची मागणी काही सामाजिक संस्थांनी केंद्र शासनाकडे केली होती, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या संस्थांना परवानगी नाकारल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. त्यावर शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासन सहआयोजक असल्यास या किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्याचे निर्देश न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळवले. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने महाराष्ट्र शासनाला आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे.

या सोहळ्यामुळे मराठी जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आग्रा येथील ऐतिहासिक ठिकाणी साजरी करण्याची पर्वणी मिळणार आहे, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व खात्याचेही आभार मानले आहेत.

 ‘दिवाण-ए-आम’मध्ये शहा जहान ऐकून घ्यायचा कैफियत

युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केलेल्या आग्रा किल्ल्यात दिवाण-ए-आम म्हणजेच प्रेक्षक सभागृह आहे. मोगल सम्राट शहा जहान याच दिवाण-ए-आममध्ये लोकांच्या सार्वजनिक बैठका घेत असे आणि त्यांची कैफियत म्हणजेच समस्या ऐकून घेत असे. स्थापत्य कलेच्या दृष्टीने पाहिले तर दिवाण-ए-आम हे चपखलपणा आणि डिझाइनचे एक नेत्रदीपक संयोजन आहे. शहा जहानचे मार्बलवरील प्रेमाचेही हे आणखी एक उदाहरण आहे. दिवाण-ए-आम हे सभागृह आग्रा किल्ल्यातील मच्छी भवनला लागूनच आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!