कर्मचारी विमा महामंडळाची रुग्णालये कामगार विभागाकडे हस्तांतरित होणार!


मुंबई: कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रुग्णालये (इएसआयसी) ही इतर राज्यात कामगार विभागाकडून अतिशय उत्तम पद्धतीने संचालित केली जात आहेत. महाराष्ट्रातील रुग्णालये सुद्धा कामगार विभागाकडून संचालित करण्यासाठी ती कामगार विभागाकडे तत्काळ हस्तांतरित करावीत, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्रातील प्रादेशिक मंडळाची ११४ वी बैठक गुरुवारी मंत्रालयातील परिषद कक्षात कामगार मंत्री तथा ईएसआयसी राज्य अध्यक्ष डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, ईएसआयसीचे विभागीय संचालक तथा सदस्य सचिव अनील साहू, सदस्य संगीता जैन, रवींद्र झिमटे, वैद्यकीय आयुक्त डॉ. सी. सी. खाका, विमा आयुक्त तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

राज्यात असलेली ईएसआयसी रुग्णालये ही सर्व आजारांचा उपचार करणारी, सुपर स्पेशलिटी रुग्णालयांसारखी असावीत. तसेच त्यांना जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये जोडून घ्यावीत. रुग्णालयातील डॉक्टरांच्या १५६ रिक्त पदांचा प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्णालयासाठी अत्यावश्यक असणाऱ्या डॉक्टरांची सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्यात यावी, असे खाडे यांनी सांगितले.

जी रुग्णालये जोडलेली आहेत त्यांची देयके त्वरीत अदा करण्यात यावी. वैद्यकीय मंडळ पुनर्गठित करण्यासाठीचे नियम,अटी,शर्ती इत्यादी माहिती पुरवण्यात यावी. विचारविनिमय करून याबाबत निर्णय घेण्यात येईल.

हिंगोली आणि नंदुरबार येथे कर्मचारी संख्या चांगली असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात दवाखाने सुरु करण्यासाठी शासनाकडून जागा मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास इमारत भाड्याने घेऊन दवाखाने सुरु करावेत, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!