माझा एन्काऊंटर करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा विचारः मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप, म्हणालेः सलाईनमधून विष…


आंतरवाली सराटी (जालना):  मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्या आणि सग्यासोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. देवेंद्र फडणवीस माझा एन्काऊंटर करण्याचा विचार करत आहेत. तसेच मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या बैठकीत केला.

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांच्याच सहकाऱ्यांकडून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यांचे सहकारी राहिलेले किर्तनकार अजय बारसकर यांनी तर काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जरांगे हे हेकेखोर आहेत. त्यांनी गेल्या काही महिन्यात बंद दाराआड बैठका घेतल्या, असा आरोप केला. तर दुसऱ्या एक मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवारांचीच फूस आहे. त्यांच्या आंदोलनाचा सगळा खर्चही शरद पवार करत असल्याचा आरोप केला होता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. राज्यावर मराठ्यांचा पुन्हा एकदा दरारा निर्माण झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत, असे जरांगे पाटील म्हणाले.

सग्यासोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली जात नाही. मराठ्यांवर १० टक्के आरक्षण लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरू द्यावे, यासाठी प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझा एन्काऊंटर करावा लागेल, असे फडणवीस यांचे स्वप्न आहे. मी आज सगळे काही तुम्हाला सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना एवढीच खुमखुमी आहे तर ही बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. त्यांनी मला मारून दाखवावे. तुम्हाला माझा बळी घ्यायचा हे का? मी सागर बंगल्यावर येतो. त्यांनी माझा बळी घेऊन दाखवावा. मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. ते आम्ही घेणारच. मी १० टक्के आरक्षणाला हातही लावणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!