
मुंबईः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा पुन्हा सक्रीय झाल्यामुळे महाराष्ट्रात पुढील सहा दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागातील पिके सुकण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजामुळे माना टाकू लागलेल्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढचे सहा दिवस पावसाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
बुधवार, १३ ऑगस्टः आज विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
कोल्हापूर घाट, हिंगोली, नांदेड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची तर पालघर, ठाणे, मुंबई, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाटमाथा, सातारा, सातारा घाटमाथा, सोलापूर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
गुरूवार, १४ ऑगस्टः चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या सातही जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाची तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड मध्यम पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. उर्वरित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
शुक्रवार, १५ ऑगस्टः रत्नागिरी, सातारा घाटमाथा, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंट अलर्ट दिला आहे. उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
शनिवार, १६ ऑगस्टः रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची तर धुळे, नंदूरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
