
मुंबई: चौथ्या महिला धोरणात महिलांसाठी आरोग्य आणि स्वच्छता सुविधा उपलब्ध करण्याबाबत अधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. यानुसार महामार्गावर प्रत्येक २५ किलो मीटर अंतरावर सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
या स्वच्छतागृहांची देखभाल व व्यवस्थापन स्थानिक महिला बचतगटामार्फत करण्यात येईल. याशिवाय महामार्गावर बचतगटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे तटकरे म्हणाल्या.
महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देताना राज्यातील महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरावस्था दूर करण्याबाबतही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यातील राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गासह द्रुतगती महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले होते. महिला व बाल विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार असल्याचे तटकरे म्हणाल्या.
स्वच्छतागृहांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून, जनसुविधा केंद्राचे व्यवस्थापन महिला आर्थिक विकास महामंडळाकडून स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले.