
नवी दिल्लीः संबंध महराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज (२५ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परंतु सर्वोच्च न्यायालायाने निकाल अथवा कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. आता ४ मार्च रोजी या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालायात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात कोणताही निकाल दिला नाही किंवा कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी पुढील सुनावणीसाठी ४ मार्च ही तारीख सूचवली. त्याला सर्वोच्च न्यायालयाने अनुकूलता दर्शवली. त्यामुळे याबाबतची पुढील सुनावणी आता ४ मार्च रोजी होणार आहे.
आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालय स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाला काही निर्देश देईल, याबाबत सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु त्या शक्यतांवर आता पाणी फेरले गेले आहे.
राज्यातील अनेक स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका गेल्या पाच ते सहा वर्षांपासून झालेल्या नाहीत. निवडणुकाच न झाल्यामुळे अनेक शहरांचा कारभार प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत.
