मनोज जरांगे पाटलांच्या नादी लागू नका, सरसकट कुणबीकरणाच्या मागणीमुळे आरक्षणाला मुकाल; मराठा समाजातूनच गंभीर आरोप


साताराः मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समावेश करा, या मागणीला मराठा समाजातूनच विरोध होऊ लागला आहे. मराठा समाजातीलच आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या साताऱ्यातील शिवतीर्थावर शनिवारी (१८ नोव्हेंबर) होणाऱ्या सभेच विरोध केला असून या विरोधामुळे त्यांच्या सभेचे ठिकाण बदलण्यास भाग पाडण्यात आले आहे.  मनोज जरांगेंच्या नादी लागू नका, त्यामुळे आरक्षणाला मुकाल, असा इशाराही मराठा समाजातूनच देण्यात आला आहे.

साताऱ्यातील पोवई नाक्र्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर शीवतीर्थ म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु जरांगे यांनी या ठिकाणी सभा घेऊ नये, अन्य ठिकाणी सभा घ्यावी, अशी मागणी मराठा समाजातूनच पुढे आली. जरांगे यांनी शीवतीर्थावर सभा घेतल्यास विरोध केला जाईल, असा इशारा मराठा आंदोलक तेजस्विनी चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांना गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिला. यातून समाजांतर्गतच वाद निर्माण झाल्यामुळे या सभेचे ठिकाण बदलण्यात आले असून आता गांधी मैदानावर जरांगे पाटलांची सभा होणार आहे.

मराठा समाजाची ओळखच पुसण्याचा डाव

जरांगे पाटील मराठा समाजाचे अस्तित्वच मिटवायला लागले आहेत. मराठा हा कुणबी नाही. मराठा समाजाला तुम्ही भडकावत आहात. मराठा समाज शेतकरी आहे, असे बोलतो, परंतु शेतकरी हे सर्व जातीत आहेत. कुणबी ही ओळख देखील सर्व जातींमध्ये आहे. या आंदोलनामुळे विनाकारण मराठा समाजाची ‘मराठा’ ही ओळख पुसण्याचा डाव जरांगे पाटलांच्या आडून आखला जात आहे, असा आरोप तेजस्विनी चव्हाण यांनी केला.

जरांगे यांच्या मागण्यांना आमच्या समाजाचा विरोध आहे. त्यांनी शीवतीर्थ परिसरात सभा घेत समाजाचा अपमान करू नये. आमची मराठा ही ओळख पुसण्याचा जरांगे यांना कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी येथे सभा घेण्याचा आणि मराठा जातीचे सरसकट कुणबीकरण ही मागणी रेटण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाज त्यांना विरोध करेल, असेही चव्हाण म्हणाल्या.

जरांगेंच्या नादी लागू नका

पश्चिम महाराष्ट्रात पाच टक्के देखील कुणबी नोंदी आढळल्या नाहीत. असे असताना मग उर्वरित मराठा समाजाला कुठले आरक्षण मिळणार? जरांगे यांच्या नादी लागल्यास हा मोठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार आहे. त्यांच्या या मागणीमुळे विनाकारण ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण झाली आहे. आम्हाला आमचे आरक्षण मराठा म्हणून द्या. ते कायद्याने आणि टिकणारे द्या. यातून आम्हाला आरक्षणही मिळेल आणि आमची मराठा ही ओळखही कुणी पुसू शकणार नाही, असे तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या.

मराठ्यांचे नेतृत्व करण्यास जरांगे अयोग्य!

जरांगे यांनी विनाकारण ९५ टक्के मराठा समाजाला कुणबी बनवण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास मराठा समाज त्यांना माफ करणार नाही, असे चव्हाण म्हणाल्या. चव्हाण यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल केला. जो माणूस गेल्या दोन महिन्यांत सातवेळा विधाने बदलतो, तो समाजाच्या लढ्यासाठी योग्य नाही. जरांगे यांना कुणबी म्हणजे मराठा असा घोळ करून समाजाची दिशाभूल केली आहे. त्यांना आमचा विरोध आहे. त्यांनी पोवई नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात सभा घेत सरसकट कुणबीकरणाचा मुद्दा मांडल्यास आम्ही त्यास विरोध करू, असेही चव्हाण म्हणाल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!