राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पहिली मंत्रिमंडळ बैठक, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत घेतले ‘हे’ आठ निर्णय


मुंबईः मंत्रिपदावर आस लावून बसलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांच्या तोंडचे पाणी पळवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून सत्तेत सहभागी होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारची पहिलीच मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत ८ निर्णय घेण्यात आले. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना हा त्या आठपैकी एक महत्वाचा निर्णय आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले असून अशा प्रकारचे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. या धोरणांतर्गत नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना मोठे प्रोत्साहन दिले जाणार आहे.

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. सयाजीराव गायकवाड-सारथी शिष्यवृत्ती योजना असे या योजनेचे नाव असून मराठा, कुणबी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

नागपूर येथील मे. शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या  कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती, न्यायमूर्ती किंवा त्यांचे पती, पत्नी यांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभ देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे आणि चौकुळ येथील कबुलायतदार गावकर जमिनीबाबतही निर्णय झाला असून दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते येथील प्रवाही वळण योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.

नागपूर कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्राचा भाडेपट्टी कालावधी वाढवून आता २५ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभरातील महत्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या ‘पहिले वर्ष सुराज्याचे’ या पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

टिकेची झोड उठवलेल्या निर्णयांच्याच पुस्तिकेचे अजितदादांच्या हस्ते प्रकाशन

या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त वर्षभरातील महत्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका ‘पहिले वर्ष सुराज्याचे’ या पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपरोधाची बाब म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या वर्षात जे अजित पवार विरोधी पक्षनेते म्हणून शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयांवर टिकेची झोड उठवत होते, तेच आता सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि त्यांच्याच हस्ते सरकारच्या वर्षभरातील महत्वाच्या निर्णयांचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले, हे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीचे विशेष!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!