
मुंबई: केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘एल्डरलाईन- १४५६७’ ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान (एनआयएसडी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय आणि पुण्याच्या जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एल्डरलाईन ही हेल्पलाइन चालवण्यात येते. राज्यातील ज्येष्ठ नागरिक कोणत्याही मदतीसाठी एल्डरलाइन हेल्पलाइनच्या १४५६७ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
या हेल्पलाइन चे काम २६ जानेवारी, १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर वगळता वर्षातील ३६२ दिवस आणि आठवड्याचे सर्व दिवस सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत चालते. याद्वारे आरोग्यविषयक जागरूकता, वृद्धाश्रम, डे केअर सेंटर, पोषण, सांस्कृतिक, कला, ज्येष्ठांसंबंधी अनुकूल उत्पादने आणि मनोरंजनाशी संबंधित माहिती पुरवण्यात येते.
वैयक्तिक आणि कौटुंबिक स्तरावर कायदेविषयक, मालमत्ता, शेजारी आदींच्या अनुषंगाने वादाचे निराकरण, आर्थिक, निवृत्तीवेतन संबंधी सल्ला आणि सरकारी योजनांच्या माहितीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात येते.
चिंता निराकरण, नातेसंबंध व्यवस्थापन, मृत्यूशी संबंधित भीतीचे निवारण, वेळ, ताण, राग आदींच्या अनुषंगाने जीवन व्यवस्थापन, मृत्युपत्र बनवण्याचे महत्त्व आदी मृत्युपूर्वीचे दस्तऐवजीकरण इत्यादींसाठीही या हेल्पलाइनद्वारे मदत करण्यात येते.
यासंदर्भात राज्यभरातून जेष्ठ नागरिकांसाठी चार लाखाहून अधिक मदतीचे दूरध्वनी आले आहेत. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या मदत हेल्पलाइनने केली आहे. तसेच ३० हजाराहून अधिक प्रकरणे क्षेत्रीय पातळीवर यशस्वीरित्या हाताळली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.