सामूहिक कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द, कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची थेट सेवेतून बडतर्फी; राज्य सरकारचा मोठा निर्णय


मुंबई: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचे प्रकार ज्या  परीक्षा केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपीठी मदत करतील त्यांना सेवेतून बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते.

इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून १८ मार्चपर्यंत ३,३७३ परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

कॉपीमुक्त परीक्षेची अंमलबजावणी

परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाइल इत्यादी) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, भरारी पथकाव्दारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

विशेष बैठ्या पथकांची नियुक्ती

सर्व परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठ्या पथकाची नियुक्ती करण्यात यावी, बैठया पथकाने परिक्षा सुरु होण्यापूर्वी एक तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे. संवेदनशील परीक्षा केद्रांवर कार्यक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठया पथकात नेमणूक करावी. असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

संवेदनशील केंद्रावर ड्रोनची नजर

संवेदनशील परिक्षा केद्रांवर ड्रोन कॅमेराव्दारे आणि व्हिडीओ कॅमेराव्दारे पूर्णवेळ निगराणी करावी, सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रांवर पुरेसा बंदोबस्त, बैठी पथके, ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे कार्यरत असावेत यावर निगराणी ठेवण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभागप्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

कॉपीमुक्त परीक्षेची ‘यांच्या’वर जबाबदारी

परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची संयुक्त जबाबदारी राहील. शहरी भागात पोलिस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी राहील. त्यानुसार कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयांच्या परिक्षेच्या दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वत: भेटी द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!