मुंबईः देशभरातून मान्सून परत फिरल्यामुळे तापमानात चांगलीच वाढ होत असून त्यामुळे ऑक्टोबर हिटच्या झळा जाणवू लागल्या आहेत. आगामी काळात तापमान वाढ आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळी वाऱ्यांनी माघार घेतल्यानंतर सध्या पूर्व आणि ईशान्येकडून वारे येत आहेत. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. गरम हवा, तापमानाचा ताप, आर्द्रतेमुळे होणारी काहिली आणि सातत्याने पाणी पिऊनही घशाला पडणारी कोरड अशी अवस्था ऑक्टोबरच्या पहिल्याच पंधरवड्यात महाराष्ट्रात जाणवू लागली आहे.
एकीकडे ऊन वाढत असताना दुसरीकडे आर्द्रतेच्या पातळीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी आणि दुपारच्या वेळेत तापमानात वाढ झाल्याचे जाणवू लागले आहे आणि ऊन्हाचे चटके बसू लागले आहेत. सध्या वारेही जाणवत नसल्यामुळे वातावरणात प्रदूषके साचून राहिल्याचेही दिसत आहे.
ऊन्हाच्या या झळा इतक्या असह्य होऊ लागल्या आहेत की नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू लागला आहे. हवामानात होऊ घातलेल्या या बदलाच्या पार्श्वभूमीवर नारिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.