डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ व १५ एप्रिल रोजी मुंबई, नाशिक, नागपुरात मोफत टूर सर्किट सहलीचे आयोजन; वाचा सविस्तर तपशील


मुंबई: महाराष्ट्र संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या महान कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्वस्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने मुंबई, नाशिक आणि नागपूर येथे १४ व १५ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. टूर सर्किट सहलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्वाच्या स्थळांचा समावेश असून या सहली नागरिक,पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर टूर सर्किट सहलीमध्ये मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी, राजगृह, प्रिटिंग प्रेस, परळ येथील बी.आय.टी चाळ, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमी, त्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे.

याच टूर सर्किट सहलीमध्ये नागपूर येथील दीक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा समावेश आहे. या टूर सर्किटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि त्यांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. सर्व नागरिक, र्यटकांना या सहलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित केलेले टूर सर्किट हे सामाजिक समता आणि ज्ञानप्रसाराचे प्रतिक आहे. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. या टूर सर्किटद्वारे त्यांच्या जीवनाशी  निगडीत स्थळांना भेट देऊन पर्यटकांना त्यांचा समृद्ध वारसा समजण्याची संधी मिळेल.

महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश या उपक्रमात आहे, ज्यामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल. हा उपक्रम बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या संदेशाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा आहे.

पर्यटन विभागाचा हा प्रयत्न स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देईल आणि बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. या टूर सर्किटला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे. पर्यटन क्षेत्रातून सामाजिक जागरूकता वाढवण्याचा हा अनोखा प्रयत्न यशस्वी होईल.

समतेचा संदेश सर्वदूर  पोहोचवणे हा हेतू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित टूर सर्किट हा एक अभिनव उपक्रम आहे. बाबासाहेबांचे विचार, त्यांचे सामाजिक योगदान आणि भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे कर्तृत्व यांचा गौरव करणे हा या सर्किटचा उद्देश आहे, असे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले.

 या टूर सर्किटद्वारे पर्यटकांना बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा अनुभव घेता येईल, ज्यामुळे त्यांचा इतिहास आणि तत्त्वज्ञान समजण्यास मदत होईल. चैत्यभूमी, दीक्षाभूमी यांसारखी स्थळे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची प्रेरणास्थाने आहेत. हा उपक्रम पर्यटनाला प्रोत्साहन देतानाच स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल. डॉ. बाबासाहेबांचा समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरेल. पर्यटन संचालनालयाने यासाठी सखोल नियोजन केले असून, पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पाटणे म्हणाले.

टूर सर्किटची वैशिष्ट्ये

आयोजनाची ठिकाणे: मुंबई, नाशिक आणि नागपूर

कालावधी: दि. १४ व १५ एप्रिल, २०२५

सुविधा: प्रत्येक शहरात दररोज दोन बसेसद्वारे सहल, टूर गाइड, अल्पोपहार, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेचे वितरण.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!