ठाकरे-फडणवीस गुप्त भेटीच्या खळबळजनक बातमीत मोठा ट्विस्ट, ‘जगातील सर्वात मोठ्या पक्षा’नेच बातमी पेरल्याच्या गोप्यस्फोटाने भाजपची गोची


मुंबईः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद सुरू असतानाच शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. काँग्रेसच्या सूत्राच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली होती. मात्र आता या बातमी मागील मुख्य सूत्रधार कोण? ही बातमी कुठून आली आणि कोणी पेरली? याबाबतचा गौप्यस्फोट एका पत्रकाराने केल्यामुळे ही बातमी पेरून भाजपचीच गोची झाली आहे.

काँग्रेसमधील सूत्रांचा हवाला देत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची भेट आणि संजय राऊत यांनी भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केल्याची बातमी आज सकाळीच ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिली होती. महाविकास आघाडीचे जागावाटप अजून जाहीर झालेले नाही. काँग्रेस नेत्यांकडून शिवसेनेला (उबाठा) हव्या असलेल्या जागा देत नाही. जागावाटपाबाबत नाना पटोले यांची भूमिकाही अनेकांना मान्य नाही. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातून विस्तव आडवा जात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची आणि संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला, असा मसाला भरून ही बातमी पेरण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती.

दोन मोठे नेते भेटल्याची भेटल्याची बातमी कोणी पेरली आणि कशासाठी पेरली गेली याबाबतचा गौप्यस्फोट ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी केला आहे. सूर्यवंशी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियावर एक पोस्ट करून हा गौप्यस्फोट केला आहे.

‘दोन मोठे नेते भेटल्याची बातमी जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडून पेरण्यात आली. बातमी दाखवताना ती दुसऱ्या मोठ्या पक्षाकडून आल्याचे सांगा, जेणेकरून दोन पक्षातील दरी रुंदावेल, असे या सर्वात मोठ्या पक्षाच्या बीटचे रिपोर्टिंग करणाऱ्या बातमीदारांना सांगण्यात आले होते. पेरलेल्या बातमीत अनेक संदेश आणि फायदेही आहेत’ असे सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.

सुधीर सूर्यवंशी यांनी या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. परंतु जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा भाजप करते. त्यामुळे भाजपनेच ही बातमी पेरल्याचे सूर्यवंशी यांच्या पोस्टमधून स्पष्ट होते. या गौप्यस्फोट झाल्यानंतर भाजपची चांगलीच गोची झाली आहे. सोशल मीडियावर याबाबतच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!