राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा धुराळा, निवडणूक आयोगाने जाहीर केला निवडणूक कार्यक्रम; वाचा महत्वाच्या तारखा!


मुंबईः  गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला. निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम आज मंगळवारी जाहीर केला आहे. राज्यातील २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, २ हजार ९५० रिक्त ग्रामपंचायत सदस्यांची पदे आणि सरपंचांच्या १३० रिक्त पदांसाठीचा निवडणूक कार्यक्रम राज्याचे निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी घोषित केला. या घोषणेबरोबरच संबंधित क्षेत्रात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. २३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाणनी केली जाईल. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवसी म्हणजे २५ ऑक्टोबर रोजीच उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. या भागातील मतमोजणी ७ नोव्हेंबर रोजी केली जाईल.

सार्वत्रिक निवडणुकीच्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी

ठाणे-६१, पालघर-५१, रायगड-२१०, रत्नागिरी-१४, सिंधुदुर्ग- २४.

नाशिक-४८, धुळे-३१, जळगाव-१६८,  अहमदनगर- १९४, नंदूरबार-१६, पुणे-२३१, सोलापूर-१०९, सातारा-१३३, कोल्हापूर-८९, सांगली-९४.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- १६, बीड-१८६, नांदेड-२५, उस्मानाबाद-६, परभणी-४, जालना-४, लातूर-१३.

अमरावती-२०, अकोला-१४, यवतमाळ-३७, बुलढाणा-४८, वाशिम-२, नागपूर-३६५, वर्धा-२९, चंद्रपूर-८, भंडारा-६६, गोंदिया-४, गडचिरोली-३९.

या सार्वत्रित निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील ग्रामपंचयत सदस्यांची रिक्त पदे आणि सरपंचांची रिक्त पदे यासाठीही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!