दिवाळीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे फटाके; २० नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला मतमोजणी


नवी दिल्लीः केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणे एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान घेतले जाणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केले जाणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणुकांची घोषणा केली. या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्याबरोबर आजपासूनच आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.

२७ नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरपूर्वी महाराष्ट्रात निवडणुका घेणे बंधनकारक होते. निवडणूक आयोगाने त्यापूर्वीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

असा आहे महाराष्ट्राचा निवडणूक कार्यक्रम

  • महाराष्ट्र विधानसभेची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल.
  • २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
  • ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छानणी केली जाईल.
  • ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
  • १८ नोव्हेंबर रोजी जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावतील.
  • २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान घेतले जाईल.
  • २३ नोव्हेंबर रोजी म्हणजेच मतदान झाल्याच्या तीन दिवसांनंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

महाराष्ट्रात मतदार किती?

महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. त्यापेकी ४ कोटी ९७ लाख पुरूष मतदार तर ४ कोटी ६६ लाख महिला मतदार आहेत. युवा मतदारांची संख्या १ कोटी ८५ लाख आहे. त्यापैकी २० लाख ९३ हजार नवमतदार आहेत.

महाराष्ट्रात एकूण १ लाख १८३ मतदार केंद्रांवर मतदान घेतले जाईल. त्यापैकी ४२ हजार ६०४ मतदान केंद्रे शहरी भागात तर ५७ हजार ५८२ मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. या मतदान केंद्रांपैकी ३८८ मतदान केंद्रावर सर्व महिला अधिकारी तैनात असणार आहेत.

झारखंडमध्ये दोन टप्प्यात

झारखंड विधानसभेसाठी दोन टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. १३ आणि २० नोव्हेंबर रोजी तेथे मतदानाची प्रक्रिया पार पडेल तर २३ नोव्हेंबर रोजी म्हणजेच महाराष्ट्रातील मतमोजणीच्या बरोबरच झारखंडमध्येही मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!