महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शनिवारी शपथविधी, वाचा संपूर्ण परिचय


मुंबई: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून रमेश बैस पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४० वाजता दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.

बैस यांचे आज, शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजता मुंबई विमानतळावर आगमन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर त्यांचे स्वागत करतील.

रमेश बैस यांचा परिचय

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस पूर्वीचे मध्यप्रदेश व सध्याच्या छत्तीसगड राज्याच्या तसेच राष्ट्रीय राजकारणातील एक आदरणीय नाव आहे.

संसदीय राजकारण, समाजकारण तसेच संघटन कार्याचा तब्बल पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या बैस यांनी सार्वजनिक जीवनात नगरसेवक पदापासून केंद्रीय राज्यमंत्री व राज्यपाल पदापर्यंत विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.

२ ऑगस्ट १९४७ रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे जन्मलेले रमेश बैस यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. १९७८ मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.

१९८० ते १९८५ या कालावधीत ते मध्यप्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. याकाळात त्यांनी मध्यप्रदेश विधानमंडळाच्या अंदाजपत्रक समितीचे तसेच त्यानंतर ग्रंथालय समितीचे सदस्य म्हणून काम केले. १९८२ ते १९८८ या कालावधीत ते मध्यप्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मंत्री देखील होते.

१९८९ मध्ये बैस रायपूर येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले. त्यानंतर तब्बल सहा वेळा, म्हणजे एकूण सात वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत.

१९९८ मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात रमेश बैस यांची पोलाद व खाण मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.

१९९९ ते २००४ या कालावधीत त्यांनी रसायने व खते व त्यानंतर माहिती व प्रसारण खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पहिले. २००३ मध्ये  बैस यांना केंद्रीय खाण मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला व त्यानंतर काही काळ ते केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) होते.

आपल्या प्रदीर्घ संसदीय जीवनात बैस यांनी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू विषयक संसदीय समिती, लोकलेखा समिती, ऊर्जा मंत्रालय सल्लागार समिती, कोळसा आणि खाण मंत्रालयाची हिंदी सल्लागार समिती, नियम समिती आदी समित्यांचे सदस्य म्हणूनही कामकाज पाहिलेले आहे.

२००९ ते २०१४ या काळात बैस हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद होते. सन २०१४ ते २०१९ या काळात १६ व्या लोकसभेचे सदस्य असताना ते सामाजिक न्याय व सक्षमीकरण विषयावरील संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष होते. बैस यांनी दिव्यांग व्यक्ती तसेच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) व्यक्ती अधिकार सुरक्षा विधेयकासंदर्भात व्यापक संशोधन व अध्ययन केले आहे.

२०१९ मध्ये बैस यांची राज्यपालपदावर नियुक्ती करण्यात आली. २९ जुलै २०१९ ते १३ जुलै २०२१ या काळात ते त्रिपुराचे राज्यपाल होते. त्यानंतर १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली.

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल बैस यांना समाजसेवेची आवड असून त्यांनी अनेकदा आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी शिबिर, तसेच ग्रामीण भागांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. बैस यांनी छत्तीसगड धनुर्विद्या ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. मध्यप्रदेश बीज व कृषी विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

भगतसिंह कोश्यारी यांना निरोपः महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला. राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!