सनातन मनुवादी छत्रपतींना आजही शुद्र समजतातः संयोगिताराजेंच्या काळाराम मंदिर अनुभवावरून जितेंद्र आव्हाडांचे टिकास्त्र


मुंबईः नाशिकच्या काळा मंदिरातील महंतांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून काळाराम मंदिरात घडलेल्या या प्रकारावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावरून संताप व्यक्त केला असून छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेल वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. सनातन मनुवादी छत्रपतींना आजही शुद्र समजतात, अशा शब्दांत आ. आव्हाड यांनी टिकास्त्र सोडले आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे या नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना आलेला अनुभव त्यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून शेअर केला आहे. काळाराम मंदिरातील महंतांनी आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव केल्याचा आरोप त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे. शंभर वर्षांनंतरही ही मानसिकता का बदलली नाही? असा संपातही संयोगिताराजे यांनी व्यक्त केला आहे. संयोगिताराजे यांच्या या अनुभवाचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

हेही वाचाः छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिताराजेंना नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांकडून मज्जाव!

संयोगिताराजे यांना नाशिकच्या काळाराम मंदिरात आलेल्या अनुभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून टिकास्त्र सोडले आहे. छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. बहुजनांनो डोळे उघडा, हाच तो सनातन धर्म तुम्हाला शुद्रच मानतो, असे आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

याच काळाराम मंदिरात २ मार्च १९३० रोजी मंदिर प्रवेशासाठी आंदोलन केले होते. काही तनातनी आजही आमच्या पूर्वजांनी बाबासाहेबांना रोखले होते, असे सनातन धर्म परिषदेत फुशारक्या मारतात, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

‘काळाराम मंदिराच्या सनातमी मनुवाद्यांचा माजोरडेपणा. छत्रपती घराण्याच्या संयोगिताराजे भोसले यांच्या पूजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगिताराजेंनी त्यांना सुनावले. छत्रपतीमुळे मंदिरे राहिली त्यांनाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही? त्यांनी उत्तर दिले नाही. तुम्हाला अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले. छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. बरे झाले हे छत्रपतींच्या वारसाबरोबर झाले. जे मी सांगतो तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात. अजून कुठला पुरावा हवा आजचे छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचे काय? बहुजनांनो डोळे उघडा, हाच तो सनातन धर्म तुम्हाला शुद्रच मानतो’, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!