सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावेः हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयावर शरद पवार


नागपूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळातील बडतर्फ ११८ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला आहे. यावर प्रतिक्रिया विचारली असता सरकारचा निर्णय आहे, सरकारनेच ठरवावे, अशा मोजक्या शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. या हल्ल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच शरद पवार यांनी मात्र अगदी मोजक्याच शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या गटात वाद सुरू आहे. दोघांनीही निवडणूक आयोगासमोर दावे केले आहेत. त्याबाबत ‘शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांकडून निवडणूक आयोगाने पुरावे मागितले आहेत. त्याबद्दल काय सांगाल?’ असे विचारले असता मी काही सांगायचे कारण नाही. निवडणूक आयोग या संदर्भात निकाल देईल, असे पवार म्हणाले.  त्यांचा (निवडणूक आयोगाचा) जो काही निर्णय असेल तो कुठल्याही राजकीय पक्षाला मान्य करावा लागेल, असेही पवार म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!