माणूसपण मान्य नसणारे पुन्हा व्यवस्थेवर ताबा मिळवू पहात आहेत… महापरिनिर्वाणदिनी प्रकाश आंबेडकरांचा गर्भित इशारा

मुंबईः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनंत त्याग आणि कष्टातून इथल्या माणसाला माणूसपण मिळवून दिले. हे माणूसपण मान्य नसणारे पुन्हा व्यवस्थेवर ताबा मिळवू पहात आहेत, असा गर्भित इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी देशातील आंबेडकरी जनतेला दिला आहे.

युगपुरूष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंचा भीमसागर लोटला आहे. विविध सामाजिक व राजकीय घटकातील नेतेही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. तत्पूर्वी त्यांनी ट्विट करून देशातील आंबेडकरी जनतेला गर्भित इशारा देत सावध केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनंत त्याग आणि कष्टातून इथल्या माणसाला माणूसपण मिळवून दिले. हे माणूसपण मान्य नसणारे पुन्हा व्यवस्थेवर ताबा मिळवू पहात आहेत. त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे माणूसपण ते हिरावू पहात आहेत. आपली संघटित शक्तीच या आव्हानाला उत्तर देऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी हे आव्हान पेलण्यासाठी काय करायला हवे, हेही या ट्विटमध्ये सांगितले आहे. माणूसपण मान्य नसणारांचा आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांचे माणूसपण हिरावून घेण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संघटित राहणे हेच उत्तर असल्याचे सांगताना ‘आपली संघटित शक्तीच या आव्हाला उत्तर देऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून संघटनेने राहण्याचा संकल्प करूया. महामानवाच्या स्मृतीला हीच खरी मानवंदना,’ असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!