‘डॉ. बामु’ अधिसभा निवडणूक निकालः कोऱ्या मतपत्रिकांच्या ‘जहूर’मुळे काही जणांचा ‘उत्कर्ष’ अडचणीत!

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेच्या पदवीधर गणातील दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. तब्बल दहा तास उलटले तरी अजूनही मतपत्रिकांच्या विलगीकरणाचीच प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मतमोजणी सुरू व्हायला किमान दहा वाजण्याची शक्यता आहे. संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे उमेदवारांचा रक्तदाब मात्र वर-खाली होत आहे.

विद्यापीठ अधिसभेच्या पदवीधर गणातील १० जागांसाठी शनिवारी मतदान घेण्यात आले होते. त्याच्या मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी १० वाजता सुरू झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात या गणातील मतपत्रिकांचे प्रवर्ग निहाय विलगीकरण आणि वैध-अवैध मतांचे वर्गीकरण हाती घेण्यात आले. ते काम अद्यापही सुरू आहे. 

गेल्या दहा तासांपासून सुरू असलेलो विलगीकरण आणि वर्गीकरणाचे हे काम संपल्यानंतर बाजूला काढलेले  प्रत्येक अवैध मत उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना दाखवले जाईल. त्यावर आलेल्या आक्षेपांवर निर्णय होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल. अवैध मतांवरील आक्षोपांची संख्या आणि तीव्रता जास्त असेल तर त्यावरील निर्णयासाठीही बराच वेळ जाण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया लवकर आटोपली तर साधारणत: दहा वाजेपासून मतमोजणीला प्रारंभ होईल आणि आज रात्री १२-१२.३० पर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गाचा पहिला निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

कोऱ्या मतपत्रिकांच्या ‘जहूर’मुळे काही जणांचा ‘उत्कर्ष’ अडचणीत: या निवडणुकीत कोऱ्या मतपत्रिकांची संख्या अधिक आहे. असंख्य मतदारांनी फक्त एकच प्राधान्यक्रमाचे मत देऊन बाकी मतपत्रिका कोऱ्या ठेवल्या आहेत. तर सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या मतदारांना नीट मतदानही करता येत नसल्याचे या निवडणुकीत पुन्हा सिद्ध झाले आहे. परिणामी अवैध मतांची संख्याही मोठी आहे. कोऱ्या मतपत्रिकांचा ‘जहूर’ आणि अवैध मतांची संख्या कोणाच्या ‘उत्कर्षा’त अडथळा ठरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!